Monday, April 29, 2013

ऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे

दर्जेदार ऊस उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांनी शोधलीच, शिवाय रोपांचा उपयोग करणाऱ्या ग्राहक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला आहे. 
राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर जिल्ह्यात चिंचवाड (ता. करवीर) येथील संदीप पाटील यांचे दोन एकर शेत पंचगंगा नदीच्या पूरक्षेत्रात आहे. दरवर्षी उसाचे शेत पुरात बुडते. सन 1995 मध्ये पुराचे पाणी जास्त दिवस राहून संपूर्ण ऊस कुजला. पुन्हा लावण करण्याची वेळ आली. पूर ओसरल्यानंतर किंवा भात पिकानंतर रोपवाटिकेद्वारे रोपांची लावण करायची, असे निवृत्त प्राध्यापक डॉ. के. एम. पोळ यांनी सुचविले. त्यानुसार संदीप प्लास्टिकच्या पिशवीत रोपे तयार करून लावण करू लागले. उगवण चांगली होत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरीही रोपांची मागणी करू लागले. उगवण न झालेल्या रिकाम्या जागी रोप लावण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यातूनच संदीप यांच्या रोपवाटिका व्यवसायाचा जन्म झाला. त्यांना वडील शांतिनाथ व ज्येष्ठ बंधू सचिन पाटील यांचीही मदत होते. 

भाड्याच्या जागेत रोपवाटिका - 
रोपांची मागणी वाढू लागल्याने रोपवाटिकेसाठी क्षेत्र कमी पडू लागले. यासाठी महिन्याला 1500 रुपये भाड्याने दीड एकर क्षेत्र घेतले. गेली सहा वर्षे याच जागेत ते रोपवाटिका करतात. सुमारे 13 महिला कामगार त्यांच्याकडे आहेत. वर्षाला पाच लाख रोपे तयार करतात. दोन ते अडीच रुपये प्रति रोप अशी विक्री होते. त्यातून सुमारे दहा लाख रुपये मिळतात. रोपवाटिकेचा साडेआठ लाख रुपये खर्च वजा जाता दोन - अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. 

बियाणे प्लॉट नियोजन - 
फुले 265, को 86032, 99010, 99004 या जातींची रोपे संदीप तयार करतात. बियाणे कृषी विभागाकडून खरेदी करतात. पंधरा गुंठ्यांत चार प्लॉट करून त्यात ठराविक दिवसांच्या अंतराने कांड्यांची लागवड केली जाते. एकावेळी सुमारे तीन टन उसाची तोड होते. त्यापासून 12 ते 15 हजार रोपे आठवड्यात तयार केली जातात. प्लास्टिकच्या पिशवीत गाळाची माती, गांडूळ खत, जिवाणू खते (पीएसबी, ऍझोटोबॅक्‍टर) आदींचे मिश्रण भरून त्यात एक डोळा पद्धतीने लावण होते. कृषी विभागाने अधिकृत जाहीर केलेली जिवाणू खतेच ते वापरतात. एका वर्षी अनधिकृत जिवाणू खते वापरल्याने दीड लाख रोपे खराब झाली होती. सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. रोपांच्या उगवणीसाठी कोकोपीट वापरल्यास 35 दिवसांच्या आत लावण करावी लागते, अन्यथा ती पिवळी पडतात, वाढीची ताकद कमी होते. यासाठीच गाळाच्या मातीत प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करतात. 

रोपवाटिका खर्च - (अंदाजे) 
रोपवाटिकेच्या अर्धा एकर क्षेत्राचे भाडे (महिन्याला 1500 रु.) - अठरा हजार 
माती, शेणखत (60 ते 70 गाडी) - 850 रुपये प्रति गाडी - 50 हजार 
सव्वा टन प्लास्टिक पिशवी (100 रुपये किलोप्रमाणे) - 1 लाख 20 हजार 
वर्षाला 70 टन बियाणे (तीन हजार रुपये टनाप्रमाणे) - दोन लाख दहा हजार 
वीज, पाण्यासाठी वार्षिक - 30 हजार 
मजूर (वार्षिक) - चार लाख 
जिवाणू खते, अन्य निविष्ठा - दहा हजार 
एकूण खर्च - साडेआठ लाख रुपये 
रोपांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न - दहा ते बारा लाख रु. 

रोपांना इतर जिल्ह्यांतूनही मागणी 
गेली दहा वर्षे रोपवाटिका व्यवसायात आहेत. पुणे, वैभववाडी, जत, जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्‍यातील शेतकरी नोंदणीद्वारे रोपे नेतात. तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी सल्लागार ए. आर. पाटील आदींचे मोलाचे सहकार्य संदीप यांना लाभले आहे. 

संदीप पाटील - 9271700909 

माळ्याची नोकरी सोडून उभारली रोपवाटिका 
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील कृषी विद्यालयात सत्यजित शिंदे माळी म्हणून सात वर्षे कार्यरत होते. नोकरीत कायम न केल्याने मनात रुखरुख होती. अखेर नोकरी सोडून तळसंदे येथे स्वतःच्या शेतीत 2009 मध्ये रोपवाटिका सुरू केली. वडील सुरेंद्र धोंडिराम शिंदे माजी सैनिक होते, त्यांनी रोपवाटिकेसाठी अर्थसाहाय्य केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडून को 86032 जातीचे बियाणे आणले. सुरवातीला दहा हजार रोपे तयार केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीची रोपे तयार करून विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते दरवर्षी बेणे खरेदी करतात. पहिल्या वर्षीच्या बियाण्यापासून रोपे तयार केल्यास त्यांची वाढ उत्तम होत नाही, वजन कमी भरते. यामुळेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीचे बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरतात. 

रोपांसाठीचे व्यवस्थापन 
दिवसाला दोन हजार, तर महिन्याला सुमारे 30 हजार रोपेनिर्मितीचे उद्दिष्ट असते. दरवर्षी एक ते दीड लाख रोपे तयार करतात. को 86032, फुले 265 आदी जातींच्या बेण्यांची 20-20 गुंठ्यांवर लागवड होते. एक रोप तयार करण्यासाठी दीड ते पावणेदोन रुपये खर्च येतो. दोन ते अडीच रुपये प्रति रोप याप्रमाणे विक्री होते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये अधिक मागणी असते. सातारा, गोटखिंडी, उदगाव, आष्टा, तसेच परिसरातील शेतकरी रोपांची खरेदी करतात. आगावू नोंदणी करावी लागते. 
- सत्यजित शिंदे - 9158982042 

आधुनिक पद्धतीकडे भीमरावांचा ओढा 
वारणानगरचे भीमराव केकरे पाच लाख रुपये खर्चून उभारलेल्या शेडनेटमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रोपांची निर्मिती करतात. आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती असल्याने मागणी अधिक आहे. दिवसाला तीन हजार रोपांच्या निर्मितीसाठी सुमारे 100 प्लास्टिक ट्रे लागतात. त्यासाठी लागणारे कोकोपीट आंध्र प्रदेशातून खरेदी करावे लागते. दिवसाला दहा पोती लागतात. 10 ते 13 कामगार दररोज त्यांच्याकडे कामास आहेत. अडीच ते तीन हजार रोपेनिर्मितीसाठी सहा हजार रुपये दिवसाला खर्च येतो. अडीच रुपये दराने रोपांची विक्री केल्यानंतर खर्च वजा जाता अंदाजे दहा टक्के निव्वळ नफा मिळतो. 

भीमराव केकरे - संपर्क - 9552528632 

रोपवाटिकेचे फायदे 
- रोपवाटिकेतील रोपांची उगवण क्षमता चांगली असते. 
- बेणेप्रक्रिया केलेली असल्याने कीड - रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. 
- साखर कारखाना लावणीची नोंद दीड महिना अगोदर करून घेतो, यामुळे तोड वेळेवर होते. 
- थेट रोपांच्या लावणीमुळे दोन भांगलणी, खताची एक मात्रा यावरील खर्च वाचतो. 
- रोपांतील अंतर योग्य ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे होते. 
- पारंपरिक लावणीच्या तुलनेत उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते. 
- हंगामानुसार पाण्याच्या काही पाळ्या वाचतात. 
- रोपांमध्ये फुटव्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे सरासरी उत्पादनात चांगली वाढ होते. 

रोपे वापरण्याचा फायदा झाला 
पूर्वी दोन डोळा पद्धतीने लावण करायचो. एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. रोपवाटिकेतून रोपे विकत घेऊन लावण सुरू केली. आता 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते. किडी - रोगांचा विशेषतः काणी, खोडअळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळले. 
- रघुनाथ चव्हाण, तळसंदे 

माझे शेत पूरक्षेत्रात आहे, त्यामुळे कांडी लावणीनंतर अनेक ठिकाणी उगवण होत नाही किंवा पुराचे पाणी जास्त दिवस शेतात राहिल्यास उसाची मरतूक होते. या मोकळ्या जागा रोपांच्या लावणीतून भरून घेतो. खोडव्यामध्येही अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने जागा रिकामी राहते. या ठिकाणीही रोपांची लागवड करण्यात येते. 
- दिलीप पांडुरंग पवार, कदमवाडी, जि. कोल्हापूर 

तज्ज्ञांचा कोट 
उसाची लावण करताना कांडी पायाने जमिनीत पेरतात. यामध्ये डोळा खराब होण्याचा, तसेच कांडी खोलवर गेल्याने उगवण न होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे 100 टक्के उगवण होत नाही. साहजिकच उत्पादनावर परिणाम होतो. याउलट रोप लागवडीत रोपांची संख्या योग्य ठेवली जाते. दोन रोपांतील अंतरही योग्य ठेवले जाते. खतांचा पुरवठा योग्य ठिकाणी होतो. यामुळे खते वाया जाण्याचा धोका टळतो. ठिबक सिंचन केल्यास फायदा वाढतो. रोपलावणीत योग्य व्यवस्थापनाची सांगड घालून उत्पादन वाढविणे शक्‍य आहे. 

- डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

No comments:

Post a Comment