Wednesday, January 16, 2013

ऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण


ऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे/लाल कांडी, मर, तांबेरा, पोक्का बाईंग, केवडा, अननस (पायनापल), गवताळ वाढ, केवडा, आदी रोगांचा प्रादूर्भाव होतो. ऊस उत्पादनात घट होऊ नये म्हणून या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे वापर करणेही गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील जमीन व हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल व पोषक असले तरी गेल्या काही वर्षांपासून उसाचे उत्पादन घटत आहे. याउलट उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. ऊस उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. ऊस पिकावर पडणार्‍या रोगांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे, लाल कांडी, मर, तांबेरा, पोक्का बाईंग, केवडा, अननस, गवताळ वाढ, विषाणूजन्य व बुरशीजन्य केवडा रोगांचा प्रादूर्भाव होतो. या रोगांमुळे उत्पादनात घट होते हे लक्षात घेऊन वेळीच रोग नियंत्रण केल्यास रोग आटोक्यात येऊ शकतात.
चाबूक काणी
हा रोग ‘युस्टीलॅगो सायटॅमिनी’ नावाच्या बुरशीमुळे होतो. ऊस पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे रोगट उसाच्या शेंड्यातून काळ्या रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर येतो. हा काळा रंग म्हणजेच ‘काजळी’ या रोगाचे असंख्य बीजकण असतात. हा रोग लगेच ओळखता येतो. ऊस बारीक होतो. पाने अरुंद व लहान होतात व त्यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे, वार्‍याद्वारे, पाण्याद्वारे होतो. बीजकण निरोगी उसाच्या डोळ्यावर पडतात व त्यावर रोगाचा प्रादूर्भाव होतो.
नियंत्रण
* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावेत. प्रादूर्भाव झालेला ऊस उपटून टाकावा व अशा उसाचा खोडवा घेऊ नये.
* बाष्प उष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेले मळ्यातील बेणेच नवीन लागवडीसाठी वापरावे.
* लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा. कोव्हीएसआर-९८०५.
गाभा रंगणे (लाल कांडी)
हा रोग ‘कॉलीटोट्रायकम फालकॅटम’ या बुरशीमुळे होतो. हा रोग सुरुवातीला ओळखता येत नाही. या रोगामध्ये ऊस उभा कापल्यावर आतील भाग तांबडा झालेला दिसतो व त्यातून आंबट अल्कोहोलसारखा वास येतो. ज्या उसाला या रोगाचा प्रादूर्भाव झालेला असतो त्या उसाचे तिसरे किंवा चवथे पान निस्तेज पडून नंतर पूर्ण शेंडा वाळतो. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. उसाचे वजनदेखील कमी भरते. रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.
नियंत्रण
* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावे. उसाला पाणी कमी द्यावे. खोडवा ठेवू नये. ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.
* पिकांची फेरपालट करावी.
* लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून वापरावे.
* रोगग्रस्त शेतातील उसाची कापणी शक्यतो लवकर करावी.
* ऊस कापण्याचा कोयता निर्जंतूक करून घ्यावा.
* ऊसतोड, कापणीनंतर शेतातील पाचट, वाळा, फणकटे जागेवरच जाळून नष्ट करावी.
* रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७.
तांबेरा
हा रोग ‘पकसीनिया’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे हिवाळ्यात दिसतात. पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात व त्यातून लालसर धूरिकरण बाहेर पडतात.
नियंत्रण
* ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.
* या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. उदा. को-६३१९८, को-७२१९.
पोक्का बाईंग
हा रोग ‘फ्युजॅरियम मोनिलीफॉरमी’ या बुरशीमुळे होतो. हा रोग पूर्वी आढळत नव्हता. सध्याच्या वातावरणात तो कुठे, कुठे आढळून येत आहे. ‘पोक्का बाईंग’ याचा अर्थ शेंड्याजवळील पानांचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. उसाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. तसेच शेंड्याकडील पाने एकमेकांमध्ये वेणीसारखी गुंफली जातात. या रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास सुरकुत्या पडतात, पाने आकुंचित होतात, शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, फांद्या आखूड होतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो, तर रोगाची तीव्रता तापमानातील फरकामुळे वाढते.
नियंत्रण
* उसाची लागवड लवकर करावी.
* रोगाची लागण दिसल्यास २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पायनापल (अननस) रोग
हा रोग ‘सेरॅटोसिस्टीस पॅराडोक्सा’ या जमिनीत राहणार्‍या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार ऊस लागवड झाल्यानंतर दिसून येतो. बेण्यावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास बेणे उगवत नाही. प्रादूर्भाव झालेली ऊस कांडी वजनास हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होत नाही व रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वाळते. रोगट उसाच्या कांड्यांचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो, म्हणून याला ‘अननस रोग’ म्हणतात. या रोगाचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे होतो. क्वचित उंदरामुळे, किडीमुळे अथवा अवजारांमुळे उसाला इजा झाल्यासही होतो.
नियंत्रण
* निरोगी बेणे वापरावे. पाण्याचा योग्य निचरा झालेली जमीन निवडावी. उसाची लागवड जास्त खोल करू नये. लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम अथवा ५० ग्रॅम बेलेटॉन १०० लिटर पाण्यात मिसळावे व या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवून लागवड करावी.
केवडा (लोह कमतरता)
हा रोग लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. या रोगाचा प्रादूर्भाव मुख्यतः पांढरीच्या किंवा पोयट्याच्या जमिनीत आढळतो. अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियम या क्षारांचे प्रमाण अधिक असल्यास लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे उसावर ‘केवडा’ दिसून येतो. रोगाच्या सुरुवातीला शिरांचा हिरवटपणा नष्ट होऊन उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडतात. पिकास निस्तेजपणा येतो. रोगाचा प्रादूर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्यास पाने पूर्णपणे पांढरट होतात व केवड्याच्या पानांसारखी दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची, कमी कांड्या बारीक होतात.
नियंत्रण
* हेक्टरी २.५ किलो हिराकस (फेरस सल्फेट) ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
* हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा. उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये. हेक्टरी १० किलो हिराकस कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.
मर
हा रोग ‘फ्युजॅरियम मोनिलीफॉरमी’ या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर आणि निस्तेज होतात व नंतर वाळतात. रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यास ऊस पूर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्या कुजतात व ऊस अलगदपणे उपटून येतो. ऊस कांड्यांचे समान दोन भाग केल्यास कांड्यांच्या आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो. बराचसा भाग तंतूमय झालेला दिसतो. या रोगाचा प्रादूर्भाव देठ कुजणे किंवा मूळ पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने होतो.
नियंत्रण
* लागवडीपूर्वी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात उसाचे बेणे बुडवून लागवड करावी.
* निरोगी बेणे वापरावे. रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.
* मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा. फेरपालटाची पिके घ्यावीत.
बुरशीजन्य केवडा
हा रोग ‘स्न्लेरोस्पोरा सॅकॅरी’ या जमिनीत राहणार्‍या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला झाडांची पाने वरच्या बाजूने पिवळसर होऊन पानाच्या खालील बाजूस बुरशीची वाढ दिसून येते. झाडाची वाढ खुंटते. रोग बळावल्यानंतर रोगट पाने लांबीच्या दिशेने फाटतात. या रोगाचा प्राथमिक प्रसार जमिनीतील लैंगिक बीजाणूद्वारे होतो व दुय्यम प्रसार अलैंगिक बीजाणूद्वारे होतो. या रोगास ढगाळ वातावरण, हवेतील जास्तीची आर्द्रता पोषक असते.
नियंत्रण
* निरोगी बेणे वापरावे.
* लागवडीपूर्वी बेण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी.
* रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा व जमिनीची फेरपालट करावी.
विषाणूजन्य केवडा
हा विषाणूजन्य रोग असून, या रोगाची लक्षणे अनियमित आकाराच्या पिवळसर पट्ट्यांच्या स्वरूपात दिसून येतात. रोगट उसाच्या फुटव्यावरसुद्धा या रोगाची लक्षणे आढळतात. हा रोग ‘सॅकॅरम व्हायरस-१’ किंवा ‘शुगरकेन व्हायरस-१’ मुळे होतो. या रोगाचा प्रादूर्भाव मका, ज्वारी व इतर गवतावरसुद्धा आढळून येतो. रोगट बेणे तसेच शेतातील गवत व किडीद्वारे रोगाचा प्रसार होतो. मावा ही कीड या रोगाच्या दुय्यम प्रसारासाठी कारणीभूत ठरते.
नियंत्रण
* रोगमुक्त बेण्यांचा वापर करावा. रोगट झाडे शोधून नष्ट करावीत.
* मावा किडीचा किटकनाशकाद्वारे प्रतिबंध करावा.
* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
गवताळ वाढ
हा रोग ‘मायकोप्लाझमा’ नावाच्या अतिसूक्ष्म जिवाणूमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे उसाच्या बुंध्यापासून किंवा खोडव्यापासून असंख्य फुटवे फुटतात. फुटवे बारीक पिवळसर, पांढरट रंगाचे, अरुंद व लहान असतात. जास्त फुटव्यांमुळे बेण्याला गवताच्या बेटासारखे स्वरूप येते, म्हणून या रोगाला ‘गवताळ वाढ’ म्हणतात. रोगग्रस्त बेण्यापासून एकही ऊस तयार होत नाही. रोगाचा प्रादूर्भाव जास्त झाल्यास २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.
नियंत्रण
* लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा. गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे. रोग झालेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.
* बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून ठेवावे.
* किटकनाशके वापरून मावा किडीचे नियंत्रण करावे.
* लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी. उदा. कोव्हीएसआर-९८०५, कोव्हीएसआर-४९४.
- करुणा कुर्‍हाडे
- रवींद्र चव्हाण
- रमेश लव्हेकर
- विद्या भगत
- पंडितराव खळीकर

कृषी महाविद्यालय, नायगाव (बाजार), जि. नांदेड, दूरध्वनी क्र. ०२४६५-२६२५९९

ऊस लागवडीची सुधारित पद्धत


जानेवारी महिन्यात सुरू उसाची लागवड केली जाते. ऊस लागवडीसाठी शेतकर्‍यांची आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. सध्याची पाण्याची उपलब्धता व जमिनीचा प्रकार पाहून ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत फायदेशीर ठरू शकते. यांत्रिकीकरण व आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बेणे प्रकारानुसार डोळा पद्धतीचाही अवलंब करता येईल. ऊस पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी, उसाची कोणती जात निवडावी, बेण्यांची निवड, बेणे छाटणी, बेणे प्रक्रिया, लागवड पद्धत आदींविषयी माहिती देणारा हा लेख…
जमिनीची निवड
ऊस लागवडीसाठी १ मीटर खोली असलेली, मध्यम ते भारी पोताची निचरायुक्त जमीन निवडावी. हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. १० टन जमीन तयार करताना व १० टन लागवडीच्या वेळी द्यावे. चोपण जमिनीसाठी ५-१० टन जिप्सम प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. हेक्टरी ४०-६० किलो युरिया, ५० टक्के ७५ किलो एसएसपी व ५ किलो जिवाणू खत द्यावे.
लागवड हंगाम व उसाच्या जाती (वाण)
पूर्व हंगाम (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) -
कोसी ६७१, कोसी ८०१४, कोसी ८६०३, कोसी ७८१९, कोसी ७४०, कोसी ९४०१
सुरू हंगाम (जानेवारी ते फेब्रुवारी) -
कोसी ८९०३, कोसी ६७१, कोसी ७५२७, कोसी ७४०, कोसी ९४०१२, कोसी ४३४
आडसाली (जुलै ते ऑगस्ट) -
कोसी ८६०३२, कोसी ८०१४, कोसी ६७१, कोसी ७२१९, कोसी ७४०
खोडवा -
कोसी ८६०३२, कोसी ६७१, कोसी ७२१९, कोसी ७४०
बेणे निवड
* उसाचे बेणे जाड, रसरशीत, जोमदार असावे.
* ऊस लागवडीच्या वेळी, बेण्याचे वय १०-११ महिने असावे.
* बेणे रोग व कीडमुक्त असावे.
* मुळ्या फुटलेला, पांग फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
* डोळ्यांची वाढ चांगली (पूर्ण झालेली नसावी) व डोळे फुगीर असावेत.
* खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.
* डोळे जास्त जुने व निस्तेज नसावेत. जास्त वयाचे बेणे वापरणे भाग पडत असेल तर बुडाकडील जुन्या कांड्या काढून टाकाव्यात. कारण त्याचे डोळे कठीण व तपकिरी रंगाचे झालेले असावेत. हिरवट रंगाचे डोळे असलेला उसाचा वरचा भाग घ्यावा.
ऊस बेण्यांची घ्यावयाची काळजी
* पाचट काढू नये.
* बेणे तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने तोडावे व कोयता अधूनमधून फिनेलच्या द्रावणात बुडवून निर्जंतूक करावा.
* शिळे झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात लागणीपूर्वी २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.
बेणे निवडीचे फायदे
* बेण्याची उगवण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते. खर्चात बचत होते.
* तोडणीच्या वेळी वजनदार उसाची एकरी संख्या ४५,००० ते ९०,००० पर्यंत राहते.
* खत, पाणी व मशागतीस ऊस चांगला प्रतिसाद देतो.
बेणे छाटणी
* दोन डोळ्यांच्या बेणे टिपर्‍या धारदार कोयत्याने कराव्यात.
* बेणे टिपरी तयार करताना बुडक्याकडील बाजूच्या डोळ्याचा खालचा भाग २/३ ठेवावा व शेंड्याच्या बाजूच्या डोळ्याचा वरचा भाग १/३ ठेवून बेणे टिपरी तोडावी.
बेणे प्रकिया
* लागवडीपूर्वी ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.
* एक किंवा दोन डोळ्याची टिपरी १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम (बाविस्टीन/नेकेस्टीन) १०० लिटर पाण्यात व ३०० मि. लि. मॅलॉथियान द्रावणात मिसळून १०-१५ मिनिटे बुडवून लावावीत.
* ५० लिटर पाण्यात + ५ किलो बायोबा मिसळून रबडीयुक्त द्रावण करावे. (एक टन बेण्यासाठी)
ऊस लागवडीच्या पद्धती 
(जमिनीतील ओलाव्यानुसार)
कोरडी लागण
मध्यम ते भारी जमिनीत २ ते ३ इंच खोल व योग्य अंतरावर टिपरी लावून मातीने झाकून घ्यावे. नंतर २ ते ३ वेळा हलके पाणी द्यावे.
फायदे
* बेणे योग्य खोलीवर व अंतरावर लावता येते.
* उगवण १०-२० दिवसांत पूर्ण होते.
* लवकर उगवणीने कोंब जोरदार येतो.
* एकरी उसाची संख्या ४५,००० राखण्यास मदत होते.
* उत्पन्नात वाढ होते.
ओली लागण
हलक्या जमिनीत अशी लागवड करावी. सरीमध्ये पाणी देऊन पाण्यातच सरीच्या चळीत २-३ इंच खोलीवर बेणे टिपरी दाबून लावावी.
बेणे डोळा लागवड पद्धत
(टिपरीवरील डोळ्यांच्या संख्येनुसार)
उसाच्या संख्येचा विचार करता १ चौरस फुटात १ ऊस असावा.
१ एकर = ४३,५६० चौरस फूट, एकरी ४३५६० = ४५०००
तीन डोळा टिपरी (पारंपरिक पद्धत)
या पद्धतीत बेणे जास्त लागते. खर्च जास्त येतो. एकरी ४५००० ऊस संख्या राखता येत नाही. ऊस जाडीस लहान पडतो, उत्पन्नात घट येते.
दोन डोळा टिपरी
दोन डोळ्याच्या टिपर्‍याची लागण करताना दोन टिपर्‍यांतील अंतर ६ ते ८ इंच (१५ ते २० सें. मी.) ठेवावे व बेणे टिपरीचे डोळे वरंब्याच्या बाजूस राहतील असे मातीत दाबावे. पट्टा पद्धतीत- एकरी ७००० ते ८५०० टिपरी.
फायदे
* ३३ टक्के बेणे व खर्चात बचत होते.
* दर एकरी अपेक्षित उसाची संख्या राखता येते.
* सर्व लागवड हंगामात लागणीस योग्य.
एक डोळा टिपरी
लागण १ फूट व १.५ फूट अंतरावर सरीस आडवी करावी. आडसाली व पूर्व हंगामासाठी ही पद्धत योग्य आहे. सुरू हंगामात जास्त तापमान, पाण्याची कमतरता व खोड किडीचा प्रादूभार्र्व यांमुळे नांग्या पडून उत्पन्नात भर पडते. एकरी ९,००० एक डोळा बेणे लागते. फुटवे वाढविण्यासाठी जाड कोंब दीड महिन्यांनी मोडावा.
फायदे
* ६६ टक्के बेणे लागते व खर्चात बचत होते.
* काळजी घेतल्यास एकरी ४५,००० ऊस संख्या मिळते.
* ऊस जाडीस चांगला पोसतो व उत्पन्नात वाढ होते.
तोटे
* टिपरी तयार करताना जास्त काळजी घ्यावी लागते.
* नांग्या पडण्यास न भरल्यास उत्पन्नात वाढ
ऊस पुनर्रोप लागवड
लागवडीपूर्वी १ ते १.५ महिने अगोदर एक डोळा बेणे वरीलप्रमाणे तयार करून लागवडीच्या वेळी ४५ रोपांची, खत दिलेल्या सरीत पुनर्रोप लागवड करावी. जमिनीत करावयाच्या आराखड्यानुसार ऊस लागण करावी. पारंपरिक पद्धतीत दोन सरीतील अंतर २.५ ते ३ फूट ठेवून कट वाफा (७ बाय ७/१० बाय १० मीटर) पद्धतीने वाफे तयार करून लागण करतात.
तोटे
* पाण्याचा जास्त वापर करावा लागतो.
* आंतरपीक घेण्यास अयोग्य, घेतल्यास उत्पन्नात घट येते.
* पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.
लांब सरी पद्धत
* दोन सर्‍यांतील अंतर ४ ते ४.५ फुटांपर्यंत ठेवावे.
* लांबी ४०-६० मीटर ठेवावी.
* पाणी देताना २-० सर्‍यांना एकत्र पाणी द्यावे.
फायदे
* पिकास आवश्यक तेवढेच पाणी देता येते.
* पिकाची वाढ जोमदार होते, उत्पन्नात वाढ होते.
* जमिनी खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
* यांत्रिकीकरणास ही पद्धत योग्य आहे.
पट्टा पद्धत/जोड ओल पद्धत (२.५ बाय ५ फूट) (३ बाय ६ फूट)
एक किंवा दोन सरी आड पट्टा ठेवून उसाची लागवड करावी. रिजर अथवा ट्रॅॅक्टरच्या सहाय्याने तीन फूट अंतरावर सर्‍या सोडाव्यात. ऊस लागण करताना दोन सर्‍यात लागण करावी व एक सरी मोकळी सोडावी. सरीचा पट्टा सहा फूट रुंदीचा राहतो, तो आंतरपीक लागवडीसाठी वापरता येतो.
पट्टा पद्धतीचे फायदे
* भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळते.
* आंतरपिकाचे बोनस उत्पन्न मिळते.
* ठिबक सिंचन पद्धतीसाठी योग्य.
* पाटाने पाणी दिल्यास पाण्यात बचत होते.
* रिकाम्या जागेमुळे पीक संरक्षण चांगले होते.
* तणाचा प्रादूर्भाव कमी होते.
* यांत्रिकीकरणासाठी योग्य पद्धत.
* खोडवा ठेवल्यास पाचट आच्छादनासाठी योग्य पद्धत.
रुंद सरी पद्धत
दोन सरीतील अंतर ५ फूट ठेवावे व सरीची लांबी ४० ते ६० मीटर ठेवावी. दोन डोळा किंवा एक डोळा पद्धतीची लागण करावी.
फायदे
* सरीतील अंतर जास्त असल्याने ऊस भरण्याचे प्रमाण कमी असते.
* वाढ जोमदार होते.
* उत्पन्नात वाढ होते.
आंतरमशागत
बाळ बांधणी

ऊस लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी बाळ बांधणी करावी. अवजाराने किंवा मजुराच्या सहाय्याने उसाच्या बुडाला ३ ते ४ इंच माती लावावी.
फायदे
* फुटवे वाढण्यास मदत होते.
* खताचा दुसरा हप्ता माती आड करता येतो.
* खोड किडीचे व तणाचे नियंत्रण करता येते.
मोठी बांधणी
लागणीनंतर चार ते साडेचार महिन्यांनी उसाच्या बुंध्याशी असलेली वाळलेली रोगर पाने उशिरा आलेले फुटवे काढून टाकावेत. सरीत शिफारशीतील खताची शेवटची मात्रा देऊन काढलेले पाचट सरीआड पसरावे.
फायदे
* खताच्या मात्रा मातीआड करता येतात.
* फुटवे कमी करण्यास मदत होते.
* जुनी मुळे काढली जातात, नवीन मुळांची वाढ चांगली होते.
* जमिनीत हवा खेळती राहते.
* तण नियंत्रण होते.
* ऊस तोडण्याचे प्रमाण कमी होते.
आंतरपिके
आडसाली उसामध्ये

भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, पाखड, राई, कोथिंबीर, मेथी, कांदा ताग
पूर्व हंगामी उसामध्ये
कोबी, फूलकोबी, कांदा, बटाटा, हरभरा, गहू, पालक, मेथी, ताग
सुरू उसामध्ये
भुईमूग, सोयाबीन, पालक, गवार, ताग, काकडी, कलिंगड इत्यादी आंतरपिके घ्यावीत.
घ्यावयाची काळजी
आंतरपीक हे ४ महिन्यांच्या आत निघणारे असावे. जास्त उंचीचे व जास्त पसरणारे नसावे. मुख्य पिकाव्यतिरिक्त खताच्या मात्रा द्याव्यात. आंतरपिकास व ऊस पिकास योग्य त्या तणनाशकाची निवड करून वेगवेगळ्या फवारण्या कराव्यात.
फायदे
* आंतरपिकाचे पूरक उत्पन्न मिळते.
* जमिनीचा ओलावा पुरेपूर वापरला जातो.
* तणांचा बंदोबस्त करण्यास मदत होते.
* बांधणीच्या वेळी आंतरपिकाचा पालापाचोळा गाडावा, सेंद्रिय खत म्हणून वापरावा.
खत व्यवस्थापन
सेंद्रिय खताचा वापर

ऊस पिकासाठी साधारणतः हेक्टरी २० टन किंवा कम्पोस्ट खताचा वापर करावा. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी १० टन शेणखत शेतात पसरून नांगरट करून चांगले मिसळावे. नंतर ऊस लागणीअगोदर राहिलेले हेक्टरी १० टन शेणखत व रासायनिक खताचा पहिला हप्ता द्यावा.
फायदे
* सेंद्रिय खतामुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते.
* जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
* निचरा सुधारतो. जिवाणूंची वाढ होते.
* रासायनिक खताचा कार्यक्षमतेने वापर होतो. याशिवाय हिरवळीची खते, प्रेसमककेक, कोंबडी खत, बार्पोकम्पोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी, पाचटाचे आच्छादन होते.
* गांडूळ खत २ टन प्रति एकर, शेणखतात मिसळून वापरावे.
रासायनिक खतांचा वापर
शास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक खताचा वापर केला जात नाही. किफायतशीर वापर होण्यासाठी खताचे योग्य प्रकार निवडावेत. नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे ठरते.
खताची योग्य निवड
ऊस पिकास दुसर्‍या व तिसर्‍या खताच्या हप्त्याच्या वेळी फक्त नत्रयुक्त खते द्यावीत. मिश्रखते, ऊस लागणीच्या वेळी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी देणे योग्य आहे. युरिया, एस. एस. पी. आणि एम. पी. यांसारखी खते योग्य प्रमाणात मिसळून घ्यावीत. खारवट व चोपण जमिनीसाठी सरल खतांची निवड करावी.
मायक्रोबाची मात्रा
पहिली फवारणी १० व्या आठवड्यात एकरी ५०० मि. लि. २०० लिटर पाण्यात करावी.
दुसरी फवारणी १५ व्या आठवड्यास करावी.
तिसरी फवारणी २० व्या आठवड्यास करावी.
खते देण्याचा कालावधी
उगवणीसाठी मुळाच्या व अंकुराच्या जोमदार वाढीसाठी स्फूरद व पालाश ५० टक्के या प्रमाणात द्यावे. फुटवे फुटताना व वाढीसाठी ६ ते ८ आठवड्यांना ४० टक्के नत्र, १२ ते १४ आठवड्यांना १० टक्के नत्र, मोठ्या बांधणीच्या वेळी ४० टक्के नत्र द्यावे. खोडवासाठी तोडणीनंतर १५ दिवसांच्या आत ३० टक्के नत्र + ५० टक्के स्फूरद + पालाश, ६ ते ८ आठवड्यांनी ३० टक्के नत्र, मोठी बांधणीसाठी ४० टक्के नत्र + ५० टक्के स्फूरद + पालाश द्यावे.
खते देण्याची पद्धत
खते जमिनीवर पसरून द्यावीत. जमिनीतून देणे फायदेशीर आहे. युरिया व निंबोळी पेंडीची भुकटी ६ः१ या प्रमाणात मिसळावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे व मिश्रण चांगले घुसळून घ्यावे. नत्रीकरण मरगतीने होते व त्यातील नत्र पिकास योग्य प्रमाणात हळूहळू उपलब्ध होते. २५ टक्के युरियाची बचत होते. स्फूरद खते मुळाच्या सान्निध्यात किंवा कम्पोस्ट खतात मिसळून द्यावीत. सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत.
पाणी व्यवस्थापन
पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन व व्यवस्थापन करावे. योग्य प्रमाणात पाणी वापरून कमीत कमी पाण्यात व खर्चात जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता कायम ठेवून अधिकाधिक उत्पादन कसे मिळविता येईल हे पहावे. ऊस पिकास पाणी देण्याची पद्धत, पाणी केव्हा द्यावे व प्रत्येक भरणीच्या वेळी किती पाणी द्यावे, या तीन बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
लांब सरी पद्धत
हलकी जमीन असल्यास सर्‍यांची लांबी ३० मीटर, मध्यम जमिनीत सर्‍यांची लांबी ५० मीटर ठेवावी. हलक्या जमिनीत पाणी लवकर मुरते. त्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर कमी करावे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एका वेळी एकाच सरीत पाणी न देता दोन ते तीन सर्‍यांमध्ये प्रवाह सारख्या प्रमाणात विभागून द्यावा. बाष्पीभवन विरोधी आच्छादनाचा (उसाचे पाचट/पालापाचोळा हेक्टरी ८ ते १० टन) वापर केल्यास बाष्पीभवन कमी होते. लेओबीन (१४ टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाच्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. उन्हाळ्यात ८-१० दिवसांनी, हिवाळ्यात १२-१५ दिवसांनी, तर पावसाळ्यात १५-२० दिवसांनी फवारण्या कराव्यात.
ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे
उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. पाण्याची ३५ ते ५५ टक्क्यांपर्यंत, तर खताच्या मात्रेत ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादूर्भाव कमी व पर्यायाने खुरपणीचा व तणनाशकांचा खर्च कमी होतो. रान बांधणीची आवश्यकता नाही. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन नापीक होण्याची शक्यता नाही.

एकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश कबाडे यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे सातत्य अलीकडील काही वर्षांपासून ठेवले आहे. सुधारित तंत्रज्ञान, एकात्मिक व्यवस्थापनाबरोबर अभ्यास, प्रयोगशील वृत्ती व काटेकोर नियोजनाचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या ऊस शेतीतून घालून दिला आहे.

सुरेश कबाडे - 9403725999
पेठ- सांगली रस्त्यावर आष्ट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कारंदवाडीचे शिवार लागते. कृष्णा नदीचे पाणी, निचऱ्याची जमीन यामुळे या भागातील अनेक शेतकरी भाजीपाला, ऊस शेती करतात. यापैकीच सुरेश कबाडे एक. त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती. सन 1984-85 पासून आपले वडील अप्पासाहेब यांना ते शेतीत मदत करू लागले. पारंपरिक व्यवस्थापनात एकरी 40 ते 50 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. शेतीची जबाबदारी घेतल्यानंतर मात्र सुरेश कबाडे यांनी सुधारित तंत्राचा वापर करीत ऊस शेतीत आमूलाग्र बदल केला. त्यांचे लागवड व्यवस्थापनातील काही नियोजन थोडक्‍यात असे. 

मशागत व लागवडीचा टप्पा 
- उसाचा खोडवा तुटून गेला, की रोटाव्हेटर फिरवून हरभरा घेतला जातो, तो निघाला की दोन वेळा नांगरट. 
- एकरी पाच ते सहा ट्रॉली कंपोस्ट किंवा शेणखत विस्कटणे. 
- 15 मेच्या दरम्यान सऱ्या सोडून धैंचा (एकरी 25 किलो बियाणे). सुमारे 50 दिवसांनी फुलोरा आला की धैंचा न उपटता सरीमध्ये दाबला जातो व वरंब्याची सरी बनवली जाते. 
- सरीत एकरी दोन पोती डीएपी, दोन किलो फोरेट व आठ किलो अन्य कीटकनाशक यांचा डोस 
- साडेचार फुटांची सरी व एक डोळा पद्धतीने लावण, दोन डोळ्यांतील अंतर दोन फूट. 
बेणे प्रक्रिया - क्‍लोरपायरिफॉस दोन मि.लि. आणि कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी 
- उगवणीनंतर एक महिन्यात तुटाळी भरून घेण्यासाठी लावणीवेळीच रोपांची निर्मिती एका सरीत जादा केली जाते. 

खत व्यवस्थापन थोडक्‍यात (खतांचे प्रमाण पोत्यांमध्ये, एक पोते - 50 किलो) 
- उगवणीनंतर 30 ते 35 दिवसांनी - एक पोते युरिया, एक पोते अमोनिअम सल्फेट, एक पोते पोटॅश. युरियाला निंबोळी पेंडीचे कोटिंग - 
- 60 दिवसांनी - दोन पोती 12-32-16, एक पोते युरिया, एक पोते अमोनिअम सल्फेट, एक पोते पोटॅश. या वेळी कुदळीने कोंबांना छोटीशी भर. 
- 85 दिवसांनी प्रत्येकी दहा किलो झिंक, फेरस व गंधक, 25 किलो मॅग्नेशिअम, पाच किलो मॅंगेनिज, तीन किलो बोरॉन व सिलिकायुक्त खत यांचे मिश्रण करून चाळलेल्या शेणखतात मिसळले जाते. आठ दिवस ठेवले जाते व मातीआड करून दिले जाते. 
- 110 दिवसांनी पॉवर टिलरच्या साहाय्याने रिव्हर्स भरणी. त्या वेळी दोन पोती डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश, तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक असलेले खत एकरी दोन बॅगा टाकून रिव्हर्स भरणी. 
- 135 ते 140 दिवसांनी पॉवर टिलर रेजरच्या साहाय्याने भरणी. या वेळी प्रत्येकी एक पोते युरिया व पोटॅश. 
- 165 ते 170 दिवसांनी पाचट काढून एक आड एक सरीत टाकले जाते. त्या वेळी शेवटचा डोस दोन पोती 12ः32ः16, एक पोते युरिया. कुदळीचे चर काढून हा डोस दिला जातो. तिथून दोन महिन्यांनी दुसऱ्यांदा पाचट काढणे. 
सूक्ष्म अन्नद्रव्ये (प्रति लिटर डोस) 
फवारणी - पहिली 30 दिवसांनी - पाच मि.लि., सोबत 19-19-19 विद्राव्य खत पाच ग्रॅम 
दुसरी - साठ दिवसांनी - दहा मि.लि. सोबत 13-0-45 दहा ग्रॅम 
तिसरी - 90 दिवसांनी - दहा मि.लि., सोबत 0-0-50 दहा ग्रॅम 

जीवाणू खते - 
ही खते देताना जमिनीत भरपूर ओल हवी. शक्‍यतो संध्याकाळी चारनंतर ते द्यावे. 35 दिवसांनी, 50 दिवसांनी, तसेच 65 व 80 दिवसांनी ते दिले जाते. 

खोडवा व निडवा व्यवस्थापन 
खोडवा व निडवा व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष. 
- आडसाली ऊस गेल्यानंतर पाचटाची कुट्टी, उसाचे बुडखे तासून घेणे, त्यानंतर बगला मारून घेणे. 
- त्यानंतर एका बाजूला प्रत्येकी दोन पोती डीएपी व युरिया, एक पोते पोटॅश, दुसऱ्या बाजूला झिंक व फेरस दहा किलो, 25 किलो मॅग्नेशिअम, पाच किलो मॅंगेनिज, तीन किलो बोरॉन यांचा वापर. 
- त्यानंतर पाणी दिले जाते. पाचट कुजण्यास सुरवात होते. दोन महिन्यांनंतर पॉवर टिलर चालवला जातो, त्या वेळी दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश, त्यानंतर एका महिन्याने एक पोते डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश मात्रा. 
- पुन्हा महिन्याने दोन पोती डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश असा शेवटचा डोस 

बेणे मळा 
चांगल्या बेण्यावरच 20 टक्के उत्पादन अवलंबून असते, असे कबाडेंचे मत आहे. 
- स्वतःच्या शेतावरच आठ ते दहा गुंठ्यांवर बेणे मळा करतात. 
- नऊ ते दहा महिने वयाचे बेणे निवडतात. जाड, लांब पेऱ्याचे व रुंद पानाचे हवे. पाच ते सहा इंच तळातील घेर, पेरे दहा इंच लांबीचे अशा पद्धतीने तयार करतात. दरवर्षी बेणे मळ्यातील चांगला ऊस निवडून निवड पद्धतीने निरोगी व चांगली रोपे वेगळी केली जातात, त्यांचा वापर होतो, त्यामुळे गवताळ वाढ कमी राहते. बेणे चांगल्या दर्जाचे मिळते. 

कबाडे यांच्या ऊस शेतीची वैशिष्ट्ये : 
- हिरवळीच्या खतांचा चांगला वापर 
- सर्व खते मातीआड करून दिली जातात, त्यामुळे खते वाया जात नाहीत 
- साडेचार फुटांवरील लागवड या वर्षीपासून सहा फुटांवर 
- शेतीच्या देखभालीसाठी कायम पाच मजूर 
- उसाची एकरी संख्या 40 ते 42 हजार 
- कंपोस्ट खत वापरावर भर 
- संपूर्ण क्षेत्राला सरी पाटाने पाणी, भविष्यात संपूर्ण ठिबकचे नियोजन 
- पाचटाचा वापर 
- एक डोळा पद्धतीचा वापर 
- को 86032 वाणाला प्राधान्य 

- मार्गदर्शन - वडील अप्पासाहेब कबाडे, पत्नी सौ. पद्मजा कबाडे, राजारामबापू साखर कारखान्याचे तत्कालीन ऊस विकास अधिकारी ए. एन. साळुंखे, संभाजीराव माने- पाटील, श्रेणिक कबाडे, रमेश हाके, दत्तात्रेय लाड 
-- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित 
- अनेक ठिकाणच्या कृषी प्रदर्शनांत उसाला प्रथम क्रमांक 
- महाराष्ट्रासह तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, नेपाळ आदी शेतकऱ्यांची कबाडे यांच्या शेतीला भेट 

उत्पादन 
- लावण उसाचे एकरी सरासरी उत्पादन 100 टन, खोडवा - एकरी 65 ते 70 टन, निडवा - 50 ते 55 टन 
अलीकडील चार ते पाच वर्षांत आडसालीचे 11 एकरांत 1125 टन, 13 एकर 26 गुंठ्यांत 1480 टन, 
सात एकरांत 755 टन, साडेनऊ एकरांत 1006 टन, तीन एकरांत 305 टन असे उत्पादन मिळाले आहे. 


सुरेश कबाडे - 9403725999

Sunday, January 13, 2013

सकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास

रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे मका, ज्वारी व ओट हंगामी पिकांबरोबर लसूणघास, बरसीम इ. चारा पिकांची लागवड करावी. जनावरांच्या आहार नियोजनानुसार एकदल व द्विदल चारा पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. 
सोमनाथ माने 

दुग्ध व्यवसायात सतत वर्षभर योग्य प्रमाणात हिरव्या व सुक्‍या चाऱ्याचा पुरवठा होणे जनावरांसाठी तसेच दूध उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी हंगामानुसार विविध चारा पिकांची लागवड व हंगामी चारा पिकाबरोबर काही वार्षिक व बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करावी. त्यामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा होतो. रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे मका, ज्वारी व ओट हंगामी पिकांबरोबर काही वार्षिक/ बहुवार्षिक लसूणघास, बरसीम इ. चारा पिकांची लागवड करावी. हंगामी ज्वारी, बाजरी या चारा पिकांमध्ये दोन- तीन कापण्या होणाऱ्या जातीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. जनावरांच्या आहार नियोजनानुसार एकदल व द्विदल चारा पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. रब्बी हंगामामध्ये सुक्‍या चाऱ्यासाठी (कडबा) ज्वारीची लागवड करावी. रब्बी हंगामामधील कडबा वर्षभर चांगल्या प्रतीचा राहतो. 

ज्वारी -
ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता, पौष्टिकता चांगली आहे. याचा पाला रुचकर असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. ज्वारी लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन- तीन पाळ्या द्याव्यात. पुढील काळातील चाऱ्याची कमतरता लक्षात घेऊन चाऱ्यासाठी ज्वारीच्या शिफारशीत जातींच्या लागवडीचे नियोजन करावे. लागवडीसाठी एम.पी. चारी, निळवा, रुचिरा, पुसा चारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. चाऱ्यासाठी ज्वारीची लागवड ऑक्‍टोबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पिकाची पहिली कापणी पीक फुलोऱ्यात असताना (65 ते 70 दिवस) करावी. पहिल्या कापणीत हेक्‍टरी 500 क्विंटल चारा उत्पादन मिळू शकते; मात्र पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर जनावरास खाऊ घालू नये. ज्वारी पिकाचा मूरघास तयार करता येतो. 

बरसीम - 
बरसीम हे द्विदल वर्गातील एक महत्त्वाचे चारा पीक आहे. बरसीमचा चारा पालेदार असून सकस व रुचकर असतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 ते 19 टक्के इतके असते. बरसीम पिकासाठी मध्यम व भारी, तसेच चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. या पिकाच्या पेरणीकरिता जमीन भुसभुशीत असणे आवश्‍यक आहे. त्याकरिता जमीन खोलवर एकदा नांगरून घ्यावी व त्यानंतर दोन वेळा कुळवावी. किंवा रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन भुसभुशीत करावी. लागवड ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत करावी. लागवडीसाठी वरदान, जे.बी.1, जे.एच.बी. 146 हे जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. प्रति हेक्‍टरी लागवडीसाठी 30 किलो बियाणे लागते. पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 200 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणीपूर्वी प्रति हेक्‍टरी 15 ते 20 टन शेण खत जमिनीत मिसळून द्यावे. तसेच पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार 15 किलो नत्र, 90 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. घासाची कापणी झाल्यानंतर खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. पेरणी केल्यानंतर पहिली कापणी साधारणपणे 45-50 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या 25-30 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे बरसीम पिकाच्या तीन-चार कापण्या मिळतात. योग्य व्यवस्थापन केल्यास तीन-चार कापणीचे चारा उत्पादन 600 ते 800 क्विंटल प्रति हेक्‍टर इतके मिळते. 

लसूणघास - 
हे अतिशय लुसलुशीत, हिरवेगार व पौष्टिक चारा पीक आहे. या पिकामध्ये 19 ते 22 टक्के प्रथिने आहेत. लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करावी. जमिनीची चांगली मशागत करून लागवडीसाठी 5 मीटर x 3 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करून 30 सें.मी. अंतरावर लागवड करावी. हेक्‍टरी 25 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी आर.एल.-88, सिरसा-9, आनंद-2 या जाती निवडाव्यात. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक चोळावे. लागवडीच्या वेळेस माती परीक्षणानुसार 15 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. त्यानंतर प्रत्येक चार महिन्यांनी 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. पिकाच्या गरजेनुसार दर पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यावे. पहिली कापणी 55 ते 60 दिवसांनी व नंतरच्या सर्व कापण्या 25 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे हेक्‍टरी 100 ते 120 टन हिरवा पौष्टिक चारा जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकतो. 

मका - 
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. रब्बी हंगामाच्यादृष्टीने ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-2, विजय या जातींची निवड करावी. वेळेत पेरणी करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पेरणीसाठी हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 20 ते 25 गाड्या शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्यांनी नत्राचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना करावी, म्हणजे पौष्टिक व चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्‍याचे हेक्‍टरी 550 ते 700 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. 

ओट - 
या पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असून, खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते. पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन या पिकास चांगली मानवते. या पिकास भुसभुशीत व खोल नांगरट जमीन मानवते. जमिनीत हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने एक खोल नांगरट करून एक ते दोन कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. लागवडीसाठी सहा मीटर लांब व तीन ते चार मीटर रुंद वाफे तयार करावेत, यामुळे पुढे क्रमाक्रमाने कापणीचे नियोजन करणे शक्‍य होते. लागवडीसाठी फुले हरिता, केंट, आर ओ 19 या जाती निवडाव्यात. पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 100 किलो उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे. पेरणी 30 सें.मी. अंतरावर पाभरीच्या साह्याने करून लगेच पाणी द्यावे. पिकास पेरणीपूर्वी शक्‍य असल्यास हेक्‍टरी तीन ते चार टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीसाठी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश वापरावे. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 50 किलो पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा. तणनियंत्रणासाठी 25 ते 30 दिवसांनी निंदणी अथवा खुरपणी करणे गरजेचे आहे. त्या पुढील कालावधीत पिकांची उंची व वाढ जलद होत असल्यामुळे तणांचा जोर कमी होत जातो. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिकाधिक प्रमाणात येण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या द्याव्यात. पहिला कापणी पेरणीनंतर 50 दिवसांनी करावी. दुसरी कापणी 30 दिवसांनी करावी. जातीनुसार प्रति हेक्‍टरी सरासरी एका कापणीद्वारे 400 ते 450 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. ओल्या हिरव्या चाऱ्यात 22 टक्के प्रथिने आहेत. 

संपर्क - श्री. माने - 9881721022 
(लेखक पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.) 

चारा पिकांचे नियोजन - 
पीकलागवडीची वेळवाणकापणीहेक्‍टरी उत्पादन (टन) 
एकदलज्वारीऑक्‍टोबरअमृता, मालदांडीदोन महिन्यानंतर35-40 
ऑक्‍टोबर- नोव्हेंबरअफ्रिकन टॉलदोन महिन्यानंतर65-70 
ओटऑक्‍टोबर- नोव्हेबंरकेन्ट, आरओ 19 (फुले हरिता) 60पहिली कापणी 55 दिवसांनी नंतरच्या कापण्या 25 दिवसांनी35-40 
द्विदललसूणघासनोव्हेंबर- जानेवारीआरएल 88, आनंद 2, सिरसा 9पहिली कापणी 40 दिवसांनी नंतरच्या कापण्या 25 दिवसांनी100-120 
बरसीमऑक्‍टोबर- नोव्हेंबरवरदान, मेस्कावी, जेबी 9पहिली कापणी 45 दिवसांनी नंतरच्या कापण्या 25-30 दिवसांनी60-70

जनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य

पावसाच्या ताणाचा परिणाम पिकांच्या बरोबरीने जनावरांच्या आरोग्यावरही दिसू लागला आहे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुपालक चाराकुट्टी आणि गहू भुसा, झाडपाला यासारख्या पर्यायी खाद्यांचा वापर करत आहेत. आरोग्य व्यवस्थापनाच्यादृष्टीने शिफारशीनुसार लसीकरण आणि जंतनिर्मूलनावर पशुपालकांनी लक्ष केंद्रित केले आहे. 
चारा वाया जाणार नाही यासाठी काटेकोर 
पहिल्यापासूनच जनावरांच्या संख्येनुसार चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन केले असेल, तर वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेच्या प्रश्‍नावर मात करता येते, हा माझा अनुभव आहे. माझ्याकडे दहा होल्स्टिन फ्रिजियन गाई, दहा कालवडी, तीन जाफराबादी म्हशी आणि 15 उस्मानाबादी शेळ्या आहेत. त्यांच्यासाठी वर्षभर हिरवा चारा मिळावा म्हणून दोन वर्षांपासून 60 गुंठे क्षेत्रावर डी.एस.एन.- 6 जातीचे नेपिअर गवत आणि लसूणघासाची लागवड करीत आहे. नेपिअरची एकदा लागवड केली की चार वर्षे उत्पादन मिळते. या चारा पिकाची उंची अन्य चारा पिकांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रातही चाऱ्याचे चांगले उत्पादन मिळते. हा चारा पालेदार आणि रुचकर असल्याने जनावरे आवडीने खातात. दररोज 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईला 25 किलो हिरवा चारा आणि पाच किलो कोरडा चारा कुट्टी करून देतो. जनावरे संपूर्ण चारा खातात. चारा वाया जात नाही. याचबरोबरीने घरच्याघरी मका भरडा, सरकी पेंड, 150 ग्रॅम मोड आलेले सोयाबीन असे मिश्रण करून प्रत्येक जनावराला चार किलो खाद्य देतो. दुधाळ जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा लागवडीचे नियोजन ठेवले आहे. सध्याच्या परिस्थितीत गरजेइतकाच चारा कुट्टी करून देतो. चारा वाया जाणार नाही आणि जनावरांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याकडे कायम लक्ष ठेवले आहे. महत्त्वाचे म्हणजे चार वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीने गोठा नियोजन ठेवले आहे. यामुळे जनावरे गरजेनुसार चारा, पाणी घेतात. त्यांना चांगला व्यायाम होतो. त्यांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनातही वाढ मिळाली आहे. वेळोवेळी पशुवैद्यकांकडून जनावरांची तपासणी केली जाते. 
उस्मानाबादी शेळीपालनही मुक्त संचार पद्धतीने केले आहे. या शेळ्यांना सध्या कुट्टी केलेला चारा आणि शेवरीचा पाला देतो. माझ्याकडे सुधारित देशी जातीच्या 200 कोंबड्या आहेत, त्याही मुक्त गोठ्यात आहेत. या कोंबड्या जनावरांच्या अंगावरील कीटक व सांडलेले धान्य, भरडा खातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र खाद्य व्यवस्थापन नाही. या कोंबड्यांपासून अतिरिक्त नफा मिळतो आहे. 

- बाळासाहेब शेंडगे 
सरडे, ता. फलटण, जि. सातारा 
9767457948 

शेळ्या - मेंढ्यांसाठी कुट्टी, गव्हाचे भूस 
माझ्याकडे 37 उस्मानाबादी शेळ्या, 83 दख्खनी मेंढ्या आहेत. यंदा पावसाच्या ताणाने चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला. पाण्याचीही टंचाई आहे. अशा काळात शेळ्या - मेंढ्यांसाठी चारा नियोजन अवघड झाले. सध्या चाऱ्याची कुट्टी, गव्हाचा भुसा, कमी प्रतीच्या गव्हाचा भरडा असे मिश्रण करून त्यांना देत आहे. 25 एकर ---- खोडवा आहे. या शेतात शेळ्या - मेंढ्या चरायला सोडल्या जातात. शेतातील तण, पाला शेळ्या - मेंढ्या खातात. सध्या स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्‍न आहे. मिळेल ते पाणी पिल्याने मेंढ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव दिसून आला. तातडीने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले आहेत. ज्याप्रमाणे जनावरांसाठी चारा डेपो शासनाने सुरू केला आहे, त्याप्रमाणेच शेळी - मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही चाऱ्याची उपलब्धता झाली पाहिजे. शेळ्या - मेंढ्या आजारी पडण्याचे प्रमाण पाहता पशुसंवर्धन विभागाने काही उपाययोजनांना सुरवात करावी. 

- सुरसिंग पवार, 
खडांबे (बु), ता. राहुरी, जि. नगर 
संपर्क - 9422224577 

खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे... पशुपालन हा माझा मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आणि आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे. 15 होल्स्टिन फ्रिजियन गाईंसाठी मुक्त संचार पद्धतीने गोठा नियोजन आहे. तीन एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर नेपिअर गवत, लसूणघास, कडवळ अशा चारा पिकांची वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. सध्या कूपनलिकेच्या माध्यमातून चारा पिकांना पाणी नियोजन केले आहे. योग्य नियोजनामुळे वर्षभर चाऱ्याची उपलब्धता होते. वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईंना दररोज 35 किलो चारा कुट्टी आणि अडीच किलो खाद्य मिश्रण दिले जाते. दुधाळ जनावरांच्या आरोग्याच्यादृष्टीने पुरेशी खनिजमिश्रणे मिळणे आवश्‍यक आहे. सध्याच्या परिस्थितीत रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आणि जंतनिर्मूलन केले आहे. 
- संदीप पवार, 
राजाळे, ता. फलटण, जि. सातारा 
संपर्क - 9922818520 

अन्य शेतकऱ्यांना शेळ्या दिल्या संगोपनासाठी 
आदर्श बंदिस्त शेळीपालनासाठी प्रसिद्ध असलेले जालना जिल्ह्यातील हरतखेडा (ता. अंबड) येथील नानासाहेब रामदास शेरे म्हणाले, की सध्या आमच्या भागात पावसाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जूनमध्ये दोन पाऊस झाले, त्यानंतर अलीकडे एकच पाऊस झाला. शेळीपालनासाठी चारा अजिबात शिल्लक नाही. पाणीही देणे मुश्‍कील झाले आहे. यातून उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस चांगला झाला. तेथील काही शेतकऱ्यांकडे शेळ्या संगोपनासाठी दिल्या आहेत. सुमारे शंभर शेळ्या प्रत्येकाला 10 ते 20 या प्रकारे पाच ते सात शेतकरी सांभाळत आहेत. त्यातून शेळ्यांना चारा उपलब्ध होईल. शेळ्यांना दोन पिल्ले झाली तर प्रत्येकी एक वाटून घ्यायचे असे ठरले आहे. सध्या मी 40 पर्यंत शेळ्यांचे संगोपन करतो आहे. काही शेळ्या नाइलाजाने विकाव्या लागल्या, काहींची मरतूकही झाली; पण धीर सोडलेला नाही. चारा महाग झाला आहे. मात्र, 20 ते 30 हजार रुपये देऊन देऊळगाव राजा येथून तो विकत आणला आहे. शेळ्यांसाठी पाणीही टॅंकरने घेतले, त्यासाठी 10 ते 15 हजार रुपये दिले. बोअरला थोडे पाणी आहे. शेळ्या जगवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शेळीपालकाकडील शेळ्यांची संख्या मोजून त्याप्रमाणे चारा पुरवण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने काही योजना सुरू केल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत शासनाची मदतच सर्वांत महत्त्वाची आहे. 

संपर्क - नानासाहेब शेरे - 9422992121

वर्षभरासाठी चाऱ्याचे नियोजन

दूध उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाचा जनावरांच्या आहारावर होणारा खर्च 60 ते 70 टक्के असतो. हा खर्च जेवढा कमी, तेवढी निव्वळ उत्पन्नात वाढ होते. सध्याच्या काळात हिरव्या तसेच वाळलेल्या चाऱ्याचे भाव सर्वसाधारण भावापेक्षा खूपच जास्त आहेत, त्यामुळेच वर्षभर चारा पुरवण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे दूध उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होऊन निव्वळ उत्पन्नाचे प्रमाण घटण्याची शक्‍यता आहे.

चारा पिकांची पेरणी करण्यापूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वर्षभर हिरवा तसेच वाळलेला चारा त्यांच्या आवश्‍यकतेनुसार पुरवण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. असे नियोजन न केल्यामुळे बऱ्याच वेळा चाऱ्याची कमतरता भासते, ज्यामुळे जनावरे अर्धपोटी ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट येतेच शिवाय त्यांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्याचप्रमाणे टंचाईच्या काळात चारा खरेदी करून जनावरांना खाऊ घालणे खूपच महाग पडते. दूध उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाचा जनावरांच्या आहारावर होणारा खर्च 60 ते 70 टक्के असतो. हा खर्च जेवढा कमी, तेवढी निव्वळ उत्पन्नात वाढ होते. म्हणून जनावरांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार वर्षभर हिरवा तसेच वाळलेला चारा पुरवण्यासाठी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

लागवडीचे नियोजन - 
तीन ते चार संकरित गाई किंवा म्हशींना वर्षभर हिरवा चारा पुरवण्यासाठी एक एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागण करावी, या क्षेत्रामध्ये दहा गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायू संकरित नेपियर, दहा गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायू लसूणघास आणि उरलेल्या 20 गुंठे क्षेत्रावर हंगामानुसार मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम यांसारख्या चारा पिकांचे उत्पादन मिळेल. यामुळे जनावरांना दररोज विविध प्रकारचा चारा देणेदेखील शक्‍य होईल. तीन वर्षांनंतर या क्षेत्रातील पिकांची फेरपालट करावी. 

संकरित नेपियर आणि लसूणघास काढून त्यांच्या ठिकाणी हंगामी पिके, तर हंगामी पिकांच्या ठिकाणी संकरित नेपिअर आणि लसूणघास यांची लागण करावी. यामुळे जमिनीचा कस टिकून राहीलच, शिवाय चारा उत्पादन भरपूर मिळेल. अशा प्रकारे नियोजन करून चारा पिकांची लागण करण्याबरोबरच त्यांचे उत्तम व्यवस्थापन करणेदेखील अत्यंत आवश्‍यक आहे. या पद्धतीने चारा पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास तीन ते चार गाई किंवा म्हशींना वर्षभर पुरेल इतपत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. 

मूरघासचा वापर - 
हिरव्या चाऱ्याचा "मूरघास' तयार करून जनावरांसाठी टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याऐवजी वापरता येतो. हिरव्या चाऱ्यात असणारे जवळपास सर्व अन्नघटक त्यापासून तयार केलेल्या मूरघासात टिकून राहतात, त्यामुळे जनावरांना मूरघास देणे हे हिरवा चारा देण्यासारखेच असते.
फुलोरा अवस्थेत असणाऱ्या एकदल प्रकारातील हिरव्या चाऱ्याचा मूरघास करावा. चाऱ्याची चांगली कुट्टी करावी आणि ती हौदामध्ये घट्ट दाबून भरावी. हौद पूर्ण भरून झाकल्यानंतर त्यातील चारा कुट्टीमध्ये बाहेरून हवा, पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.अशा प्रकारे दक्षता घेऊन तयार केल्यास उत्तम मूरघास तयार होतो. चारा हिरव्या अवस्थेतच टिकून राहतो. मुरण्याच्या प्रक्रियेमुळे चाऱ्यास जरासा आंबूस वास येतो, त्या मुळे जनावरे मूरघास आवडीने खातात. दुधाला आंबूस वास टाळण्यासाठी दुभत्या जनावरांना दूध काढून झाल्यानंतर मूरघास द्यावा. तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रात्यक्षिकाद्वारे शिकून नंतरच स्वतः मूरघास तयार करावा.

उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...

दुग्ध व्यवसायामध्ये सतत हिरव्या व संतुलित चाऱ्याची उपलब्धता ही महत्त्वाची बाब आहे. पावसाळा व हिवाळ्यात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो; परंतु उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची फार मोठी कमतरता असते, त्यासाठी हंगामी चारापिकांबरोबर वार्षिक, बहुवार्षिक चारापिके लागवडीचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. 
पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या 
चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 65 ते 70 टक्के खर्च हा खाद्यावरती होत असतो. हंगामी चाऱ्याबरोबरीने बहुवार्षिक चाऱ्याची लागवड केल्यास कोणत्याही हंगामात हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. पशुपालक पारंपरिक पद्धतीने ज्वारी, मका, गवत, ऊस यांचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करतात. उन्हाळ्यात मुख्यत्वे मका, ज्वारी, संकरित नेपिअर, मारवेल, चवळी इ. चारा पिकांची लागवड केली जाते. या काळातील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन सध्याची थंडी कमी होताच चारापिकांची लागवड करावी. संकरित नेपिअर, मारवेल ही पिके पावसाळ्यात लावावीत; परंतु पाण्याची मुबलक सोय असल्यास सध्याच्या काळातही लागवड करता येते.
सतत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांची लागवड योग्य त्या हंगामानुसार होणे गरजेचे असते. बहुवार्षिक चारा पिकांमध्ये एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षे प्रत्येक हंगामामध्ये सतत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता उन्हाळ्यामध्ये जाणवत नाही. संकरित नेपिअर, मारवेल, लसूणघास स्टायलो लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मुबलक चारा उपलब्ध होऊ शकतो. शेताच्या बांधावरसुद्धा संकरित नेपिअरसारख्या गवताची लागवड करता येते. याचे नियोजन आतापासूनच करावे. 
चाराप्रक्रिया व अपारंपरिक पिकांचा वापर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावरती प्रक्रिया करून उत्कृष्ट व पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर करता येते. खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन भुस्सा, भुईमूग पाला, तूर भुस्सा, हरभरा व गहू काड भुस्सा, भाताचे काड इ. उपलब्ध असते, त्यावर युरिया, मळी, मीठ, क्षार खनिजे व पाणी यांची प्रक्रिया करून पौष्टिकता वाढविता येते; तसेच पावसाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मक्‍यापासून मूरघास तयार करून ठेवावा, जेणेकरून उन्हाळ्यात त्याचा वापर करता येतो. पशुखाद्यामध्ये अपारंपरिक झाडांचा उपयोग करावा. अंजन, गिरिपुष्प, वड, बाभूळ इ. झाडांचा पाला खाद्यामध्ये वापरावा.

पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारापिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. उदा.ः उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्याचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यात 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, 05. टक्के स्निग्ध पदार्थ व 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यामध्ये पोषणमूल्ये कमी असतात, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो. तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावा, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.
उन्हाळ्यात दुर्लक्ष नको...
उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यामुळे शरीराचे तापमान वाढले जाते, त्यामुळे धाप लागणे, पाणी जास्त पिणे, चारा कमी खाणे, उष्माघात होणे इ. गोष्टी दिसून येतात. त्यासाठी जनावरांचा गोठा, पाणी व खाद्य या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यामुळे सुका चारा जास्त दिला जातो, त्यामुळे शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण होते, त्यासाठी हिरव्या चाऱ्याची व स्वच्छ पाण्याची सोय करणे गरजेचे असते. हिरव्या चाऱ्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा दिवसा द्यावा, सुका चारा रात्री द्यावा, तसेच स्वच्छ पाण्याची सोय गोठ्यामध्येच करावी.